रामायण या सिरीयलचे पुन्हा प्रसारण सुरु झाल्यापासून या सिरीयलने सर्व सिरियल्सला मागे टाकून टीआरपीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. ९० च्या दशकातील हि सिरीयल त्यावेळी दर्शकांच्या पसंतीची होती आणि आजसुद्धा तितकीच पसंतीची आहे. रामायणमधील प्रत्येक भूमिका आज दर्शकांच्या मनामध्ये जशीच्या तशी आहे. लोकांनीदेखील या सिरीयलमधील सर्वच भूमिकांना खूप प्रेम दिले. पण याच सिरीयलमधील एका अभिनेत्याचे आयुष्य अत्यंत हलाखीमध्ये गेले. या अभिनेत्यावर उपाशी मरण्याची वेळ देखील आली होती.
रामायण सिरीयलमध्ये महाराज दशरथच्या महामंत्रीची भूमिका अभिनेता चंद्रशेखर वैद्यने साकारली होती ज्यांनी वयाच्या ६५ व्या वर्षी महामंत्रीची भूमिका साकारली होती. परंतु चंद्रशेखर वैद्य यांचे आयुष्य खूपच संघर्षाने भरलेले राहिले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये त्यांना आपले आयुष्य व्यतीत करावे लागले. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी त्यांचे लग्न झाले होते. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये खूपच गरिबी पाहिली. त्यांना चौकीदारचे काम देखील करावे लागले होते.त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती इतकी हलाखीची होती कि त्यांना उपाशी मरण्याची वेळ देखील आली होती. नंतर त्यांच्या मित्रांच्या सांगण्यावरून ते आपले अभिनयाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईला आले. त्यांनी मुंबई येथील स्टूडियोमध्ये अनेकवेळा चकरा मारल्या. काम देणे तर दूरच राहिले त्यांना आतमध्ये येऊ देखील दिले जात नव्हते. पण काही काळानंतर त्यांचे नशीब पूर्णपणे पालटले आणि त्यांना अभिनय करण्याची संधी मिळाली.
चंद्रशेखर वैद्य मुंबईनंतर पुण्यामध्ये एक कोरस सिंगर म्हणून काम करू लागले. यानंतर चंद्रशेखर वैद्यने भारत भूषण यांच्यासोबत मिळून तीन चित्रपट बनवले. यानंतरच त्यांच्या अभिनय कारकिर्दीला एक नवीन उभारी मिळाली आणि त्यांना अनेक चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. रामानंद सागर आणि चंद्रशेखर हे खूपच चांगले मित्र होते. रामानंद सागर यांच्या सांगण्यावरूनच चंद्रशेखर यांनी रामायणमध्ये महामंत्रीची भूमिका साकारली होती.